˙˙जय मुक्ताई ..

Monday, 7 November 2016

गीता प्रवचने अध्याय २ / ४

गीता प्रवचने अध्याय २ / ४


    स्वधर्म इतका सहज प्राप्त आहे की माणसाच्या हातून सहज त्याचेच आचरण व्हावे.पण अनेक प्रकारच्या मोहामुळे ते होत नाही,अथवा फार मुश्किलीने होते.आणि झाले तरी त्यात विष कालवले जाते.स्वधर्माच्या मार्गात कांटे पसरवणाऱ्या मोहाचीं बाह्य रुपे तर असंख्य आहेत.तथापि त्यांचे विश्लेषण केले म्हणजे त्या सर्वांच्या मुळाशी जी एक मुख्य गोष्ट दिसून येते ती संकुचित आणि उथळ देहबुद्धि.मी आणि माझ्या शरीर-संबधांची माणसे एवढीच माझी व्याप्ति.ह्यांच्या बाहेरचे सर्व परके,अथवा दुश्मन,अशी भेदाची भिंत ती उभी करते,आणि मी किंवा माझे म्हणून मानलेले जे,त्यांचेहि ती शरीरच पाहते.देहबुद्धिच्या ह्या दुहेरी कोंडित सापडून आपण तऱ्हेतऱ्हेची डबकी निर्माण करू लागतो.बहुतेक सगळे ह्याच कार्यक्रमात असतात.कोणाची डबकी लहान तर कोणाची मोठी.परंतु काही झाले तरी डबकीच.ह्या शरीराच्या चामडीइतकीच त्यांची खोली.कोणी कुटुंबाभिमानाचे डबके करून राहतो,कोणी देशाभिमानाचे डबके करुण राहतो.ब्राम्हण-ब्राम्हणेतर डबकी,हिंदू-मुसलमान डबकी,एक ना दोन,अनंत डबकी.जिकडे पहाल तिकडे तीच ती.त्याशिवाय आपणास जगवतच जसे नाही.परंतु ह्याचा परिणाम काय होतो? परिणाम एकच.हीन विचारांचे जंतु आणि स्वधर्मरूप आरोग्याचा नाश. क्रमश (इति विनोबा)

शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
https://geetapravachane1.blogspot.com

Tuesday, 1 November 2016

गीता प्रवचने अध्याय २ / ३

गीता प्रवचने
गीता प्रवचने अध्याय २ / ३
     जीवन-सिद्धांत-१.देहाने स्वधर्माचरण
दुसऱ्या अध्यायात जीवनाचे तीन महासिद्धांत मांडले आहेत-१) आत्म्याची अमरता आणि अखंडता २)देहाची क्षुद्रता ३) स्वधर्माची अबाध्यता.
    असे हे तीन सिद्धांत आहेत.ह्यतील स्वधर्माचा सिद्धांत कर्तव्यरूप आहे बाकीचे दोन ज्ञातव्य आहेत.स्वधर्माविषयी मी मागच्या खेपेला थोडेसे सांगितले होते.हा स्वधर्म आपणास निसर्गत:च प्राप्त होतो.स्वधर्म शोधावा लागत नाही.आपण आकाशातून पडलो व् भूमीवर सावरलो असा काही प्रकार नाही.आपला जन्म होण्यापूर्वी हा समाज होता,आपले आईवडिल होते,शेजारी होते.अशा ह्या प्रवाहात आपण जन्मतो.ज्या आईबापांच्या पोटी मी जन्म घेतला त्यांची सेवा करण्याचा धर्म मला जन्मतःच मिळाला आहे.ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची सेवा करण्याचा धर्म मला ओघानेच प्राप्त झाला आहे.आपल्या जन्माबरोबरच स्वधर्महि जन्मतो.किंवा तो आपल्या जन्माच्या आधीच आपल्यासाठी तयार असतो असेही म्हणता येईल.कारण तो आपल्या जन्माचा हेतु आहे.तो पार पाडण्यासाठी आपण जन्मलो आहो.स्वधर्माला कोणी पत्नीची उपमा देतात,आणि पत्नीचा संबंध ज्याप्रमाणे अविच्छेद्य मानला आहे त्याप्रमाणे स्वधर्माचा संबंध अविच्छेद्य आहे असे वर्णन करतात.मला ही उपमा गौण वाटते.मी स्वधर्माला आईची उपमा देतो.माझी आई मला ह्या जन्मात निवडावयाची उरलेली नाही.ती अगाऊचीच सिद्ध आहे.ती कशीहि असो,ती माझी टळू शकणार नाही.ही स्थिति स्वधर्माची आहे.आपणाला ह्या जगात स्वधर्माशिवाय कोणताही आश्रय नाही.स्वधर्माला टाळू पाहणे म्हणजे 'स्व'लाच टाळू पाहण्यासारखे आत्मघातकीपणाचे आहे.स्वधर्माच्या आश्रयानेच आपण पुढे जाऊ शकतो.म्हणून तो आश्रय कोणी कधीही सोडू नये,हा जीवनाचा एक मूलभूत सिद्धांत ठरतो. क्रमश(इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोंविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव