˙˙जय मुक्ताई ..

Monday, 7 November 2016

गीता प्रवचने अध्याय २ / ४

गीता प्रवचने अध्याय २ / ४


    स्वधर्म इतका सहज प्राप्त आहे की माणसाच्या हातून सहज त्याचेच आचरण व्हावे.पण अनेक प्रकारच्या मोहामुळे ते होत नाही,अथवा फार मुश्किलीने होते.आणि झाले तरी त्यात विष कालवले जाते.स्वधर्माच्या मार्गात कांटे पसरवणाऱ्या मोहाचीं बाह्य रुपे तर असंख्य आहेत.तथापि त्यांचे विश्लेषण केले म्हणजे त्या सर्वांच्या मुळाशी जी एक मुख्य गोष्ट दिसून येते ती संकुचित आणि उथळ देहबुद्धि.मी आणि माझ्या शरीर-संबधांची माणसे एवढीच माझी व्याप्ति.ह्यांच्या बाहेरचे सर्व परके,अथवा दुश्मन,अशी भेदाची भिंत ती उभी करते,आणि मी किंवा माझे म्हणून मानलेले जे,त्यांचेहि ती शरीरच पाहते.देहबुद्धिच्या ह्या दुहेरी कोंडित सापडून आपण तऱ्हेतऱ्हेची डबकी निर्माण करू लागतो.बहुतेक सगळे ह्याच कार्यक्रमात असतात.कोणाची डबकी लहान तर कोणाची मोठी.परंतु काही झाले तरी डबकीच.ह्या शरीराच्या चामडीइतकीच त्यांची खोली.कोणी कुटुंबाभिमानाचे डबके करून राहतो,कोणी देशाभिमानाचे डबके करुण राहतो.ब्राम्हण-ब्राम्हणेतर डबकी,हिंदू-मुसलमान डबकी,एक ना दोन,अनंत डबकी.जिकडे पहाल तिकडे तीच ती.त्याशिवाय आपणास जगवतच जसे नाही.परंतु ह्याचा परिणाम काय होतो? परिणाम एकच.हीन विचारांचे जंतु आणि स्वधर्मरूप आरोग्याचा नाश. क्रमश (इति विनोबा)

शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
https://geetapravachane1.blogspot.com

Tuesday, 1 November 2016

गीता प्रवचने अध्याय २ / ३

गीता प्रवचने
गीता प्रवचने अध्याय २ / ३
     जीवन-सिद्धांत-१.देहाने स्वधर्माचरण
दुसऱ्या अध्यायात जीवनाचे तीन महासिद्धांत मांडले आहेत-१) आत्म्याची अमरता आणि अखंडता २)देहाची क्षुद्रता ३) स्वधर्माची अबाध्यता.
    असे हे तीन सिद्धांत आहेत.ह्यतील स्वधर्माचा सिद्धांत कर्तव्यरूप आहे बाकीचे दोन ज्ञातव्य आहेत.स्वधर्माविषयी मी मागच्या खेपेला थोडेसे सांगितले होते.हा स्वधर्म आपणास निसर्गत:च प्राप्त होतो.स्वधर्म शोधावा लागत नाही.आपण आकाशातून पडलो व् भूमीवर सावरलो असा काही प्रकार नाही.आपला जन्म होण्यापूर्वी हा समाज होता,आपले आईवडिल होते,शेजारी होते.अशा ह्या प्रवाहात आपण जन्मतो.ज्या आईबापांच्या पोटी मी जन्म घेतला त्यांची सेवा करण्याचा धर्म मला जन्मतःच मिळाला आहे.ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची सेवा करण्याचा धर्म मला ओघानेच प्राप्त झाला आहे.आपल्या जन्माबरोबरच स्वधर्महि जन्मतो.किंवा तो आपल्या जन्माच्या आधीच आपल्यासाठी तयार असतो असेही म्हणता येईल.कारण तो आपल्या जन्माचा हेतु आहे.तो पार पाडण्यासाठी आपण जन्मलो आहो.स्वधर्माला कोणी पत्नीची उपमा देतात,आणि पत्नीचा संबंध ज्याप्रमाणे अविच्छेद्य मानला आहे त्याप्रमाणे स्वधर्माचा संबंध अविच्छेद्य आहे असे वर्णन करतात.मला ही उपमा गौण वाटते.मी स्वधर्माला आईची उपमा देतो.माझी आई मला ह्या जन्मात निवडावयाची उरलेली नाही.ती अगाऊचीच सिद्ध आहे.ती कशीहि असो,ती माझी टळू शकणार नाही.ही स्थिति स्वधर्माची आहे.आपणाला ह्या जगात स्वधर्माशिवाय कोणताही आश्रय नाही.स्वधर्माला टाळू पाहणे म्हणजे 'स्व'लाच टाळू पाहण्यासारखे आत्मघातकीपणाचे आहे.स्वधर्माच्या आश्रयानेच आपण पुढे जाऊ शकतो.म्हणून तो आश्रय कोणी कधीही सोडू नये,हा जीवनाचा एक मूलभूत सिद्धांत ठरतो. क्रमश(इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोंविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव

Friday, 28 October 2016

गीता प्रवचने अध्याय २ / २

गीता प्रवचने अध्याय २ / २
🌸🌸गीता प्रवचने🌸🌸 
अध्याय दुसरा: भाग ०२
दुसऱ्या अध्यायापासून गीतेच्या शिकवणीस आरंभ झाला आणि आरंभिच भगवान् जीवनाचे महासिद्धान्त सांगत आहेत.ज्यावर जीवन उभारावयाचे ती जीवनाची मुख्य तत्वे आधी गळी उतरली म्हणजे पुढचा मार्ग सरळ होऊन जाईल अशी ह्यात दृष्टि आहे.गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सांख्य-बुद्धि ह्या शब्दाचा अर्थ ' 'जीवनाचे मुलभुत सिद्धांत'असा मी करत आहे.हे मूळ सिद्धांत आता आपणाला पहावयाचे आहेत.पण तत्पूर्वी ह्या सांख्य शब्दाच्या प्रसंगाने गीतेतिल पारिभाषिक शब्दांच्या अर्थाविषयी थोडासा खुलासा करुण घेणे बरे होईल.
   गीतेला जुने शास्त्रीय शब्द नविन अर्थाने वापरण्याची
सवय आहे.जुन्या शब्दावर नविन अर्थाचे कलम करणे ही विचारक्रांतीची अहिंसक प्रक्रिया आहे.व्यासांचा ह्या प्रक्रियेत हातखंडा आहे.त्यामुळे गीतेतील शब्दाना व्यापक सामर्थ्य येवून गीता ताज़ी टवटवित राहिली आणि अनेक विचारकांना त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाने आणि अनुभवाप्रमाणे अनेक अर्थ घेता आले.हे सर्व अर्थ त्या त्या भूमिकेवरून योग्य असू शकतात आणि त्यांचा विरोध करण्याची गरज न पड़ता आपण स्वतंत्र अर्थ करू शकतो अशी माझी दृष्टि आहे.
ह्या संबंधाने उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे.एकदा देव,दानवआणि मानव प्रजापतिकडे उपदेशार्थ गेले.प्रजापतिने सर्वाना 'द' हे एकच अक्षर दिले.देव म्हणाले "आम्ही देव कामी भोगांना चटावलेले.आम्हाला 'द'अक्षराने 'दमन करा' असे प्रजापतिने शिकविले. "दानव म्हणाले आम्ही दानव क्रोधी, दयेला पारखे झालेले.आम्हाला 'द'अक्षराने दया करा असे प्रजापतिने शिकविले." मानव म्हणाले "आम्ही मानव लोभी,संचयाच्या मागे लागलेले.आम्हाला 'द'अक्षराने दान करा असे प्रजापतिने शिकविले."प्रजापतिने सर्वांचे अर्थ बरोबर मानले.कारण सर्वाना स्वानुभवातुन ते लाभले होते.गीतेतिल परिभाषेचा अर्थ करताना उपनिषदातली ही गोष्ट आपण चित्तात बाळगावी.
क्रमश(इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
https://geetapravachane1.blogspot.com

गीता प्रवचने अध्याय २ / १

गीता प्रवचने अध्याय २ / १
आत्मज्ञान आणि सम्त्वबुद्धि
गीतेची परिभाषा
बंधूनो,मागच्या वेळेस आपण अर्जुनाचा विषाद-योग पाहिला.अर्जुनासारखी ऋजुता आणि हरिशरणता असली म्हणजे विषादाचाहि योग बनतो.यालाच हृदयमंथन म्हणतात.मी गीतेच्या ह्या भूमिकेला संकल्पकारांप्रमाणे अर्जुन-विषादयोग असे विशिष्ट नांव न देता विषाद-योग असे सर्वसामान्य नांव दिले आहे.कारण गीतेला केवळ एक निमित्त आहे.


पंढरीच्या पांडुरंगाचा अवतार पुंडलीकासाठी झाला असे नाही.पुंडलीकाचे निमित्त करुण तो आम्हा जड़जीवांच्या उद्धारासाठी आज हजारो वर्षे उभा आहे हे आम्ही पाहतो.त्याप्रमाणेच गीतेची दया अर्जुनाच्या निमित्ताने झाली तरी ती आपणा सर्वांसाठी आहे.म्हणून गीतेच्या पहिल्या अध्यायाला विषादयोग हे सामान्य नावच शोभते.येथून गीतेचा वृक्ष वाढत वाढत शेवटच्या अध्यायातील प्रसादयोगरूप फळाला पोचणार आहे.ईश्वराची इच्छा असेल तर आपणही ह्या प्रवासात तेथपर्यंत जाऊन पोचू.
क्रमशः(इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
https://geetapravachane1.blogspot.com

गीता प्रवचने अध्याय १ / १२

गीता प्रवचने अध्याय १ / १२
    ऋजु बुद्धीचा अधिकारी
       पुढील सर्व गीता समजून घेण्यास अर्जुनाची ही भूमिका आपल्या उपयोगी पडली म्हणून आपण तिचे आभार मानुच.त्याच्याशिवाय आणखीहि तिचा उपकार आहे.अर्जुनाच्या ह्या भूमिकेत त्याच्या मनाची ऋजुता दिसून येत आहे. 'अर्जुन' ह्या शब्दाचा अर्थच ऋजु किंवा सरळ स्वभावाचा असा आहे.त्याच्या मनात जे काही विकार आणि विचार आले ते सर्व त्याने मोकळ्या मनाने कृष्णापुढे मांडले.त्याने चित्तात काही ठेवले नाही आणि शेवटी तो कृष्णाला शरण गेला.वस्तुतः तो आधीच कृष्ण-शरण होता.कृष्णाला सारथि बनवून ज्या वेळेस त्याने आपल्या घोड्याचे लगाम त्याच्या हातात दिले,त्याच वेळी त्याने आपल्या मनोवृत्तिचेही लगाम त्याच्या हातात सोपिवण्याची तयारी केली होती.आपणही असेच करु या.अर्जुनाजवळ कृष्ण होता,


आपल्याला कृष्ण कोठुन लाभणार,असे आपण म्हणू नये.अन्तर्यामीरूपाने कृष्ण प्रत्येकाच्या हृदयात आहे.जवळात जवळ तोच आहे.आपल्या हृदयातील खळमळ आपण त्याच्यापुढे मांडू आणि म्हणू, "देवा,मी तुला शरण आहे.तू माझा अनन्य गुरु आहेस.मला काय तो मार्ग दाखीव.तू दाखवशील त्याच मार्गाने मी जाईन." आपण असे करू तर तो पार्थसारथि आपलेहि सारथ्य करील.आपल्या श्रीमुखाने तो आपल्याला गीता ऐकविल आणि विजय-लाभ करुण देईल.
प्रथम अध्याय समाप्त
क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
https://geetapravachane1.blogspot.com

गीता प्रवचने अध्याय १ / ११

गीता प्रवचने अध्याय १ / ११
       ह्या सर्व विवेचनावरुन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की,गीतेचा जन्म स्वधर्माच्या आड़ येणारा जो मोह,त्याच्या निवारणार्थ आहे.अर्जुन धर्म-संमूढ झाला होता.स्वधर्माच्या बाबतीत त्याला मोह पडला होता.ही गोष्ट कृष्णाने दिलेल्या पहिल्या ठपक्यानंतर अर्जुन स्वतःच कबूल करीत आहे.तो मोह,ते ममत्व,ती आसक्ति दूर करणे हे गीतेचे मुख्य काम.सारी गीता सांगितल्यावर भगवंतानी प्रश्न केला,अर्जुना,गेला मोह?


अर्जुन म्हणाला देवा मोह मेला,स्वधर्माचे भान झाले.अशा प्रकारे गीतेचा उपक्रम आणि उपसंहार जुळवून पाहिल्यास मोह-निराकरण हेच फलित निघते.गीतेचेच नव्हे,तर महाभारताचेही हेच उद्दिष्ट आहे.व्यासानी महाभारताच्या आरंभीच म्हटले आहे की लोकांच्या हृदयातील मोहावरण घालविन्यासाठी मी हा इतिहास-प्रदीप पेटवित आहे. क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
https://geetapravachane1.blogspot.com

Monday, 24 October 2016

गीता प्रवचने अध्याय १ / १०

गीता प्रवचने अध्याय १ / १०
     दुसऱ्याचा धर्म सोपा वाटला म्हणूनही स्वीकारावयाचा नसतो. पुष्कळ वेळा सोपेपणाचा भासच असतो. संसारात बायकामुलांचे नीट रक्षण करता येत नाही म्हणून कंटाळून जर कोणी गृहस्थ संन्यास घेईल, तर ते ढोंग होईल व् जडहि जाईल. संधि सापड़ताच त्याच्या वासना जोर करतील.संसाराचे ओझे झेपत नाही म्हणून वनात जाणारा आधी तेथे लहानशी झोपडी बांधील, मग तिच्या रक्षणासाठी तो कुंपण करील. असे करता करता त्याला तेथे सवाई संसार उभा करण्याची पाळी येईल. वैराग्यवृत्ति असेल तर संन्यासातहि कठिण काय आहे? संन्यास सोपा म्हणून सांगणारीहि स्मृतिवचने तर आहेतच. पण मुख्य मुद्दा वृत्तिचा आहे. ज्याची जी खरी वृत्ति असेल तदनुसार त्याचा धर्म राहील. श्रेष्ठ-कनिष्ठ,सोपे-कठिण, हा प्रश्न नाही. खरा विकास हवा. खरी परिणति हवी.


      पण कोणी भाविक विचारतात, "संन्यास जर युद्ध करण्याच्या धर्माहून केव्हाहि श्रेष्ठच आहे,तर भगवंतानी अर्जुनाला खरा संन्यासी कां बनिवले नाही? त्यांना काय ते अशक्य होते?"  त्यांना अशक्य काहीच नव्हते. पण त्यात अर्जुनाचा पुरषार्थ तो काय राहिला असता? परमेश्वर मोकळीक देणारा आहे. ज्याने त्याने धडपड करावी. त्यातच गोडी आहे. लहान मुलाला स्वतः चित्र काढण्यात आनंद असतो. त्याचा हात धरलेला त्याला आवड़त नाही. शिक्षक जर मुलांना भराभर गणिते सोडवुन देवु लागला तर मुलांची बुद्धि कशी वाढणार? आईवडिलांनी,गुरूनी,सुचना द्याव्या. परमेश्वर आतून सुचना देत असतो. ह्यहून अधिक तो काही करीत नाही. देवाने कुंभाराप्रमाणे ठोकुन,पिटून किंवा थापून प्रत्येकाचे मडके तयार करण्यात काय स्वारस्य? आपण मड़की नाही. आपण चिन्मय आहोत. 

क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
https://geetapravachane1.blogspot.com

गीता प्रवचने अध्याय १ / ९

गीता प्रवचने अध्याय १ / ९
    दुसऱ्याचा धर्म श्रेष्ठ वाटला तरी तो स्वीकारण्यात माझे कल्याण नसते.सुर्याचा प्रकाश मला प्रिय आहे. त्या प्रकाशाने माझी वाढ होते.सूर्य मला वंदनिय आहे. पण म्हणून मी पृथ्वीवरचे वास्तव्य सोडून त्याच्याजवळ जावु पाहीन तर जळून जाईन. उलट पृथ्वीवर राहने विगुण असेल,पृथ्वी सूर्यापुढे अगदीच तुच्छ असेल,ती स्वयंप्रकाशी नसेल,तथापि जोपर्यंत सूर्याचे तेज सहन करण्याचे सामर्थ्य माझ्यामधे नाही तोपर्यंत सूर्यापासून दूर पृथ्वीवर राहूनच मी माझा विकास करुण घेतला पाहिजे. माशाला जर कोणी म्हणेल,पाण्यापेक्षा दूध मौल्यवान आहे, दुधात रहा, तर मासा ते कबूल करील का? मासा पाण्यातच वाचेल, दुधात मरेल.


 क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव

Sunday, 23 October 2016

गीता प्रवचने अध्याय १ / ८

गीता प्रवचने अध्याय १ / ८
   गीतेचे प्रयोजन:स्वधर्मविरोधी मोहाचा निरास
           अर्जुन अहिंसेचिच काय,पण संन्यासाचीहि भाषा बोलू लागला होता. ह्या रक्तलांछित क्षात्रधर्मापेक्षा संन्यास बरा असे अर्जुन म्हणतो. पण अर्जुनाचा तो स्वधर्म होता का? ती त्याची वृत्ति होती का? अर्जुनाला संन्याशाचा वेष सहज घेता आला असता; पण संन्याशाची वृत्ति कशी घेता आली असती? संन्यासाच्या नावाने जर तो रानात जाऊन राहता तर तेथे तो हरणें मारू लागला असता. भगवान स्पष्टच म्हणाले, अर्जुना,अरे लढाई करणार नाही म्हणतोस, तो तुझा भ्रम आहे.तुझा आजपर्यंतचा बनलेला स्वभाव तुला लढायला लावल्याशिवाय राहणार नाही."
      अर्जुनाला स्वधर्म विगुण वाटू लागतो; पण स्वधर्म कितिही विगुण असला तरी त्यात राहूनच माणसाने आपला विकास करुण घेतला पाहिजे. कारण त्यात राहूनच विकास होवु शकतो. ह्यात अभिमानाचा प्रश्न नाही. हे विकासाचे सूत्र आहे. स्वधर्म मोठा म्हणून घ्यायचा नसतो आणि लहान म्हणून टाकायचा नसतो. वस्तुतः तो मोठाहि नसतो,आणि लहानहि नसतो.तो माझ्या बेताचा असतो.


 'श्रेयान् स्वधर्मो विगुणः' 
    ह्या गीतावचनातील 'धर्म' शब्दाचा अर्थ हिंदु धर्म,मुसलमानी धर्म,ख्रिस्ती धर्म अशासारखा नाही. प्रत्येक व्यक्तीचा धर्म निरनिराळा आहे. माझ्यासमोर असलेल्या दोनशे लोकांचे दोनशे धर्म आहेत. माझाहि धर्म दहावर्षापुर्वी होता तो आज नाही. आजचा दहा वर्षानंतर टिकणार नाही. चिंतनाने आणि अनुभवाने वृत्ति पालटत जाते तसतसा पूर्विचा धर्म गळत जातो आणि नविन धर्म लाभत असतो.हट्टाने काहीच करावयाचे नसते.
क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई 

गीता प्रवचने अध्याय १ / ७

 गीता प्रवचने अध्याय १ / ७
       मला ह्या ठिकाणी एका न्यायाधीशाची गोष्ट आठवते. एक न्यायाधीश होता.शेकड़ो अपराध्याना त्याने फाशीची शिक्षा दिली होती. परंतु ऐके दिवशी त्याचा स्वतःचा मुलगा खुनी म्हणून त्याच्यासमोर उभा करण्यात आला. त्याच्यावरचा खुनाचा आरोप सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा देण्याची न्यायाधीशावर पाळी आली. पण तसे करताना तो न्यायाधीश कचरला. तो आता बुद्धिवाद बोलू लागला,

 "फाशीची शिक्षा अमानुष आहे. ती देणे मनुष्याला शोभत नाही. मनुष्याला सुधारण्याची आशा त्यामुळे नष्ट होते. खून करणाऱ्याने भावनेच्या भरात खून केला. परंतु त्याच्या डोळ्यावरचा खून उतरल्यावर त्या माणसाला गंभीरपणे उचलून फ़ासावर लटकवून मारावयाचे हे समाजाच्या माणुसकिला लाजिरवाने व् काळिमा फासणारे आहे," 
         वगैरे मुद्दे तो न्यायाधीश मांडू लागला.तो मुलगा समोर न येता तर मरेपर्यंत न्यायाधीशसाहेब खुशाल फाशीची शिक्षा देत राहिले असते. मुलाबद्दलच्या ममत्वामुळे न्यायाधीश असे बोलू लागला. ते बोलणे आतंरिक नव्हते. ते आसक्तिजन्य होते. 'हा माझा मुलगा' ह्या ममत्वातुन निर्माण झालेले ते वाड्मय होते.
      अर्जुनाची ह्या न्यायाधीशासारखी गत झाली. त्याने मांडलेले मुद्दे चुकीचे नव्हते. गेल्या महायुद्धाचे नेमके हेच परिणाम जगाने पाहिले.पण विचाराची गोष्ट इतकीच की अर्जुनाचे ते तत्वज्ञान नव्हते,तो त्याचा प्रज्ञावाद होता. कृष्ण हे जाणून होता. म्हणून त्या मुद्याची मुळीच दखल न घेता त्याने मोहनाशाचा उपाय अवलंबिला. अर्जुन जर खरोखर अहिंसावादी झालेला असता तर अवांतर ज्ञान-विज्ञाने कोणी कितीही सांगितली तरी मूळ मुद्यान्चे उत्तर मिळाल्याशिवाय त्याचे समाधान झाले नसते. पण सबंध गीतेत ह्या मुद्याचे उत्तर नाही आणि अर्जुनाचे समाधान झालेले आहे.ह्या सर्वांचा भावार्थ इतकाच की अर्जुनाची अहिंसावृत्ति नव्हती,तो युद्ध-प्रवृत्तच होता.युद्ध त्याच्या दृष्टीने त्याचे स्वभाव प्राप्त आणी अपरिहार्य ठरलेले कर्तव्य होते.ते कर्तव्य आता तो मोहाने टाळू पाहत होता. आणि गीतेची ह्या मोहावरच मुख्य गदा आहे. 
क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

गीता प्रवचने अध्याय १ / ६

गीता प्रवचने अध्याय १ / ६

    अर्जुन रणांगणावर उभा राहिला तो कृतनिश्च्याने आणि कर्तव्यभावनेने उभा राहिला होता. क्षात्र-वृत्ति त्याच्या स्वभावात होती. युद्ध टाळण्याचा शिकस्त प्रयत्न करुण ते टळले नव्हते. कमीत कमी मागणी व कृष्णासारख्याची मध्यस्थी दोन्ही वाया गेल्या होत्या. अशा स्थितीत देशोदेशींचे राजे जमवून आणि कृष्णाला सारथ्य प्तकरायला लावून तो रणांगणावर उभा राहतो आणि वीर-वृत्तीच्या उत्साहाने कृष्णाला म्हणतो, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेवुन उभा कर, म्हणजे कोण माझ्याबरोबर लढण्यासाठी जमले आहेत त्यांची तोंडें एकदा मी पाहून घेतो. कृष्ण त्याच्या म्हणण्याप्रमाणे करतो आणि अर्जुन सभोवार नजर फिरवितो, तो त्याला काय दिसते? दोन्ही बाजूंना आपल्याच नातेवाईकांचा,सगेसोयऱ्याचा प्रचंड मेळावा उभा आहे. आजे,बाप,मुले,नातू-आप्तसंबंधाच्या चार पीढ्या मारण-मरणाच्या अंतिम निश्च्याने एकत्र झाल्या आहेत असे त्याला दिसते. ह्या गोष्टीची कल्पना आधी त्याला नसेल असे नाही. पण प्रत्यक्ष दर्शनाचा एक वेगळाच परिणाम असतो.तो सारा स्वजनसमूह पाहून त्याच्या हृदयाची कालवाकालव सुरु होते.

    त्याला फार वाईट वाटते.  आजपर्यंत त्याने अनेक लढायांत असंख्य विरांचा संहार केला होता. त्या वेळी त्याला वाईट वाटले नाही. त्याचे गांडीव गळून पडले नाही, त्याच्या शरीराला कापरे भरले नाही, त्याचे डोळे ओले झाले नाहीत; मग आत्ताच असे का? त्याच्या ठिकाणी अशोकाप्रमाणे अहिंसावृत्तीचा उदय झाला होता? नाही ही सारी स्वजनासक्ति होती.आजच्या घटकेलाहि जर समोर गुरु,बंधु,आप्त नसते तर त्याने शत्रुंची मुंडकी चेंडुप्रमाणे उडविली असती. पण आसक्तिजन्य मोहाने त्याची कर्तव्यनिष्ठा ग्रासली. आणि मग त्याला तत्वज्ञान आठवले. कर्तव्यनिष्ठ मनुष्य मोहग्रस्त झाला तरी नागडी कर्तव्यच्युति त्याला सहन होत नाही. तो तिला एखादा सद्विचार नेसवितो. अर्जुनाचे असेच झाले. तो आता युद्धच मुळात पाप आहे असे उसने प्रतिपादन करू लागला. युद्धाने कुलक्षय होईल,धर्म लोपेल,स्वैराचार माजेल,व्यभिचार-वाद पसरेल,दुर्भिक्ष ओढ़वेल,समाजावर संकटे येतील असे अनेक मुद्दे तो कृष्णालाच समजावून सांगू लागला. 
क्रमश (इति विनोबा) 
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

गीता प्रवचने अध्याय १ / ५

गीता प्रवचने अध्याय १ / ५

       अर्जुनाचे क्लैब्य दूर करुण त्याला युद्धप्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली गेली असे काही लोक म्हणतात. त्यांच्या मते गीता कर्मयोग सांगणारी आहे. एवढेच नव्हे तर ती युद्धयोग सांगणारी आहे. जरा विचार केला तर ह्या म्हणण्यातील चूक दिसून येईल. अठरा अक्षौहिणी सैन्य लढायला सिद्ध होते.अर्जुनाला सबंध गीता ऐकवून त्या सैन्याच्या लायकीचे केले असे का आपण म्हणणार? अर्जुन घाबरला.ते सैन्य घाबरले नव्हते. ते का अर्जुनाहून अधिक योग्यतेचे? ही तर कल्पनाच करवत नाही. शेकडो लढाया खेळलेला तो महावीर होता. उत्तर-गोग्रहणाच्या वेळेस त्याने एकट्याने भीष्म-द्रोण-कर्णाना हतबल केले होते. नेहमी विजय मिळविणारा,सर्व नरांतील एकच खरा नर अशी त्याची ख्याती होती. वीरवृत्ति त्याच्या रोमारोमात होती. अर्जुनाला डिंवचन्यासाठी क्लैब्याचा आरोप तर कृष्णानेहि करुण पाहिला. पण तो बाण वाया जाऊन पुढे वेगळ्याच मुद्यावर ज्ञान-विज्ञानांची अनेक व्याख्याने द्यावी लागली आहेत. तेव्हा क्लैब्य-निरसनाइतके सोपे तात्पर्य गीतेचे नाही हे निश्चित आहे.


   दुसरे काही म्हणतात, अर्जुनाची अहिंसा-वृत्ति दूर करुण त्याला युद्धप्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली आहे. माझ्या दृष्टीने हेही म्हणने बरोबर नाही. तेँ कसे,हे पाहण्यासाठी आपणाला अर्जुनाची भूमिका तपासली पाहिजे. त्या कामी पाहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायात शिरलेले आखात फार उपयोगी आहे. 

क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

गीता प्रवचने अध्याय १ / ४

गीता प्रवचने अध्याय १ / ४
अर्जुनाच्या भूमिकेचा संबंध
    कित्येकाना वाटते,गीतेचा आरंभ दुसऱ्या अध्यायापासून धरावा. दुसऱ्या अध्यायाच्या ११व्या श्लोकापासुन प्रत्यक्ष उपदेशाला सुरवात होते. तेथुनच आरंभ समजायला काय हरकत आहे? एक जण तर म्हणाला


 "अक्षरात अकार ही ईश्वरी विभूति भगवंतानी सांगितली आहे. 'अशोच्यानन्वशोचस्तवम्'च्या आरंभी आयातच अकारहि आहे.तेथुनच आरंभ धरावा.ही कोटी सोडून दिली तरी तो आरंभ अनेक प्रकारे योग्य आहे। यात शंका नाही. तरीपन तत्पूर्वीच्या प्रास्ताविक भागांचेही महत्व आहेच. अर्जुन कोणत्या भूमिकेवर आहे,कोणती गोष्ट सांगन्यासाठी गीतेची निर्मिती झाली आहे, हे हा प्रास्ताविक कथाभाग नसता तर लक्षात येते ना.
क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

गीता प्रवचने अध्याय १ / ३

गीता प्रवचने अध्याय १ / ३

     एवढे महाभारत व्यासांनी लिहिले,पण व्यासांना स्वतःचे असे काही सांगावयाचे होते की नाही? त्यांचा विशिष्ट संदेश त्यांनी कोठे सांगितला आहे का? कोणत्या ठिकाणी व्यासांची समाधि लागली आहे? ठिकठिकाणी अनेक तत्वज्ञानांची आणि उपदेशांची जंगलेच्या जंगले महाभारतात आली आहेत.पण तत्वज्ञानांचे, उपदेशांचे आणि एकंदर सारभुत रहस्य त्यांनी कोठे मांडले का? होय,सम्रग महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गगीतेत दिले आहे. गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि मननाची संपूर्ण साठवन आहे.हिच्याच् आधारे मुनीत 'मुनि मी व्यास'ही विभूति सार्थ ठरावयाची आहे.प्राचीन काळापासून गीतेला 'उपनिषद'ही पदवी मिळाली आहे.गीता उपनिषदांचेहि उपनिषद आहे. कारण सर्व उपनिषदांचे दोहन करुण हे गीतारूपी दूध भगवंतानी अर्जुनाच्या निमित्ताने जगताला दिले आहे.जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायःप्रत्येक विचार गीतेत येवून गेला आहे.म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे असे अनुभवी पुरुषांनी म्हटले आहे. गीता हा लहानसाच पण हिंदुधर्माचा मुख्य ग्रंथ आहे.


    गीता श्रीकृष्णाने सांगितली हे तर सर्वाना माहित आहे.ही थोर शिकवण ऐकणारा भक्त अर्जुन ह्या शिकवणीशी इतका समरस झाला, की त्यालाही 'कृष्ण' संज्ञा प्राप्त झाली. देवा-भक्तांचे हे हृदगत प्रगट करीत असता व्यासदेव इतके विरघळुुन गेले की त्यानाही लोक 'कृष्ण' ह्याच नावाने ओळखु लागले. सांगणारा कृष्ण,ऐकनारा कृष्ण,रचनारा कृष्ण असे तिघांत जणू अद्वैत उत्पन्न झाले.तिघांची जणू समाधि लागली. गीतेच्या अभ्यासकाला अशीच एकाग्रता पाहिजे.

 क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

गीता प्रवचने अध्याय १ / २

गीता प्रवचने अध्याय १ /
     महाभारत व रामायण हे आमचे राष्ट्रीय ग्रंथ आहेत. त्यातील व्यक्ति आमच्या जीवनाशी एकरूप झालेल्या आहेत. राम,सीता,धर्म,दौप्रदी ,भीष्म,हनुमान इत्यादी रामायण महाभारतातील चरित्रांनी सर्व भारतीय जीवन आज हजारो वर्षे व्यापुन टाकले आहे. जगातील इतर महाकाव्यातील पात्रे अशी लोक जीवनात मिसळून गेलेली दिसत नाहीत. ह्या दृष्टीने महाभारत आणि रामायण हे नि:संशय अदभुत ग्रंथ आहेत.रामायण हे मधुर नितिकाव्य आहे तर महाभारत हे व्यापक समाजशास्त्र आहे.व्यसानी एक लक्ष संहिता लिहून असंख्य चित्रे,चरित्रे व चारित्रे मोठ्या कौशल्याने यथावत रेखाटली आहेत.

केवळ निर्दोष एका परमेश्वराशिवाय कोणीही नाही पण तसेच ह्या जगात दोषपूर्ण असेही काही नाही, ही गोष्ट महाभारत स्पष्टपणे सांगत आहे.भीष्म-युधिष्ठीर अशासारख्यांचे येथे दोष दाखविले आहेत. उलट कर्ण-दुर्योधनादिकांचेहि गुण प्रगट केले आहेत.मानवी जीवन हे पांढऱ्या व काळ्या तंतुचा पट आहे ही गोष्ट महाभारत सांगत आहे. अलिप्त राहून भगवान व्यास जगातील विराट् संसाराचे छायाप्रकाशमय चित्र दाखवित आहेत. व्यासांच्या ह्या अत्यंत अलिप्त व उदात्त ग्रथन कौश्यल्यामुळे महाभारत ग्रंथ म्हणजे एक सोन्याची प्रचंड खाण बनला आहे. शोधन करुण भरपूर सोने लुटून घ्यावे.
क्रमशः (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

Friday, 21 October 2016

गीता प्रवचने अध्याय १ / १

गीता प्रवचने अध्याय १ / १

अध्याय पहिला प्रास्ताविक आख्यायिका
अर्जुनाचा विषाद
१) मध्ये महाभारतम्
   प्रिय बंधुनो!आजपासून आपण मी श्रीमद्भगवतगीतेविषयी सांगणार आहे. गीतेचा व् माझा संबध तर्कापलिकडचा आहे. माझे शरीर आईच्या दुधावर पोसले,त्याहिपेक्षा माझे हृदय व् बुद्धि यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे. जिव्हाळयाचा जेथे संबध असतो तेथे तर्कास वाव नसतो. तर्काला छाटून श्रद्धा व् प्रयोग या दोन पंखानीच गीतेच्या गगनात मी यथाशक्ति भराऱ्या मारीत असतो. मी प्रायःगीतेच्याच् वातावरणात असतो.गीता म्हणजे माझे प्राण-तत्व. मी गीतेविषयी इतरांशी बोलतो तेव्हा गीतेच्या समुद्रावर तरंगत असतो,आणि एकटा असतो त्या वेळेस त्या अमृतसमुद्रात खोल बुडी मारुन बसतो. अशा या गीता माऊलीचे चरित्र मी सांगावे असे ठरविण्यात आले आहे.

     गीतेची योजना महाभारतात केलेली आहे. गीता महाभारताच्या मध्यभागी सर्व महाभारतावर प्रकाश पाडित उंच दीपाप्रमाणे उभी आहे. एकीकडे सहा पर्वे, दुसरीकडे बारा पर्वे अशा मध्यभागी, तसेच एकीकडे सात अक्षौहिणी सैन्य, दुसरीकडे अकरा अक्षौहिणी, अशा मध्यभागी गीता उपदेशिली जात आहे.
क्रमशः (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
 जय मुक्ताई 
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव