˙˙जय मुक्ताई ..

Monday, 24 October 2016

गीता प्रवचने अध्याय १ / १०

गीता प्रवचने अध्याय १ / १०
     दुसऱ्याचा धर्म सोपा वाटला म्हणूनही स्वीकारावयाचा नसतो. पुष्कळ वेळा सोपेपणाचा भासच असतो. संसारात बायकामुलांचे नीट रक्षण करता येत नाही म्हणून कंटाळून जर कोणी गृहस्थ संन्यास घेईल, तर ते ढोंग होईल व् जडहि जाईल. संधि सापड़ताच त्याच्या वासना जोर करतील.संसाराचे ओझे झेपत नाही म्हणून वनात जाणारा आधी तेथे लहानशी झोपडी बांधील, मग तिच्या रक्षणासाठी तो कुंपण करील. असे करता करता त्याला तेथे सवाई संसार उभा करण्याची पाळी येईल. वैराग्यवृत्ति असेल तर संन्यासातहि कठिण काय आहे? संन्यास सोपा म्हणून सांगणारीहि स्मृतिवचने तर आहेतच. पण मुख्य मुद्दा वृत्तिचा आहे. ज्याची जी खरी वृत्ति असेल तदनुसार त्याचा धर्म राहील. श्रेष्ठ-कनिष्ठ,सोपे-कठिण, हा प्रश्न नाही. खरा विकास हवा. खरी परिणति हवी.


      पण कोणी भाविक विचारतात, "संन्यास जर युद्ध करण्याच्या धर्माहून केव्हाहि श्रेष्ठच आहे,तर भगवंतानी अर्जुनाला खरा संन्यासी कां बनिवले नाही? त्यांना काय ते अशक्य होते?"  त्यांना अशक्य काहीच नव्हते. पण त्यात अर्जुनाचा पुरषार्थ तो काय राहिला असता? परमेश्वर मोकळीक देणारा आहे. ज्याने त्याने धडपड करावी. त्यातच गोडी आहे. लहान मुलाला स्वतः चित्र काढण्यात आनंद असतो. त्याचा हात धरलेला त्याला आवड़त नाही. शिक्षक जर मुलांना भराभर गणिते सोडवुन देवु लागला तर मुलांची बुद्धि कशी वाढणार? आईवडिलांनी,गुरूनी,सुचना द्याव्या. परमेश्वर आतून सुचना देत असतो. ह्यहून अधिक तो काही करीत नाही. देवाने कुंभाराप्रमाणे ठोकुन,पिटून किंवा थापून प्रत्येकाचे मडके तयार करण्यात काय स्वारस्य? आपण मड़की नाही. आपण चिन्मय आहोत. 

क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
https://geetapravachane1.blogspot.com

No comments:

Post a Comment